मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांची भूमिका मोलाची होती. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी काँग्रेसने शरद पवार यांचे नाव सुचवले असल्याच्या बातम्या काल दिवसभर माध्यमांमध्ये झळकत होत्या. पण स्वतः शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावत यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. नरेंद्र मोदी यांना तगडा विरोधी उमेदवार म्हणून शरद पवार योग्य राहतील असे काँग्रेसला वाटल्याने शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. परंतु अखेर पवार यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने यावर पडदा पडला आहे.
काल दिवसभर युपीएचे नेतृत्व सोनिया गांधी शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शरद पवारांनी तिनं पक्ष एकत्र आणले आहेत त्याच पद्धतीने दिल्लीमध्ये देखील सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्यास शरद पवार यशस्वी होतील, असे सोनियांना वाटत असल्याचे बोलले जात होते. पण संध्याकाळी शरद पवार यांनी यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. परंतु या निमित्ताने शरद पवार विरोधकांची मोट बांधण्यात यशस्वी होतात का आणि ते यासाठी इतके का महत्त्वाचे आहेत हा मुख्य प्रश्न निर्माण होत आहे.
शरद पवारच का?
काँग्रेसकडे सध्या पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणताही चेहरा नाही. शरद पवार हे सर्वसमावेशक चेहरा असून सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्याचबरोबर अनुभवी चेहरा दिल्याने वेगळा प्रभाव पडू शकतो अशी भावना देखील काँग्रेसची असू शकते. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आले असण्याची शक्यता आहे.
खरेतर लोकसभा निवडणुकांना अजूनही साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. परंतु काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरु केली असून यावेळी जोरदार तयारी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा काँग्रेसचा मानस आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे यावेळी भाजपकडून सत्ता काढून घेण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे.