अहमदनगर: महाविकास आघाडीचे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यावर सुरु आहे. कुकडीच्या डाव्या कालव्याचे वाटोळे याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. ज्यावेळी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले,त्यावेळीच कुकडीच्या कामांना गती मिळाली होती. आता देखील डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानचा बोगदा आमच्या सरकारच्या मजुरीनंतरही चालू होत नाही हे दुर्भाग्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरच्या ‘कुकडी’ खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे असा गंभीर आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत न्याय पाहिजे असेल तर पहिले राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना पक्षाचे सरकार हटवा आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आणा असा निर्वाळा देखील त्यांनी केला आहे. कुकडीच्या पाण्याच्या गोंधळावरून राम शिंदे म्हणाले की, पाणी व शेतीबाबत कळवळा दाखवनाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त करून टाकले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा हात आहे. कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळ्यातील आवर्तन उशिरा पावसाळ्यात सोडून पारनेर ,श्रीगोंदे, कर्जत, करमाळा तालुक्यांतील शेती उजाड करण्याचा यांचा डाव आहे असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानचा बोगदाभारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत शिंदे म्हणाले, कुकडी डाव्या कालव्याचा इतिहास तपासून पहा. युतीच्या सरकारने “कुकडी’चे पाणी श्रीगोंदे, कर्जत करमाळा तालुक्यांत आणले होते . त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सरकार आले आणि २०१४ पर्यंत काहीच प्रगती झाली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुधारित प्रकल्पाला मान्यता मिळताना जवळपास चार हजार कोटींची मंजुरी दिली . त्यानंतर २१६ कोटींच्या डिंभे माणिकडोह बोगद्याला मान्यता दिली. हे सगळे आपण पालकमंत्री असताना झाल्याचा आनंद असला, तरी त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हे सगळे गुंडाळून ठेवले आहे असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.
कुकडी पाण्याच्या आवर्तनाकडे शेतकर्यांचे लक्ष
कुकडीचे आवर्तन केव्हा सुटणार याकडे पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील शेतकर्यांचे डोळे लागत असते. पावसाळा उंबरठ्यावर आला असला तरी देखील विहिरी, पाझर तलाव कोरडे पडलेले. पिकांना पाण्याची गरज असते. पाण्याअभावी पिके जळू लागतात त्यावेळी कुकडीचे आवर्तन सुटले तर शेतकर्यांचे हातचे पीक वाचणार यामुळे शेतकरी आवर्तन तात्काळ सुटावे यासाठी देव पाण्यात घालून बसलेले असतात.