नवी दिल्ली : कृषी विधेयकाविरोधात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याआधी हरसिमरत कौर बादल यांनी देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मागील 22 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या अकाली दलाने अचानक वेगळा मार्ग निवडल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुखबीर सिंग बादल यांनी आपली नाराजी व्यक्त करत एनडीए फक्त नावापुरते उरल्याचे म्हटले आहे.
सुखबीर सिंह बादल म्हणाले की, मागच्या सात, आठ, दहा वर्षापासून एनडीए फक्त नावाला आहे. एनडीएमध्ये काही नाही. एनडीएमध्ये कुठली चर्चा होत नाही, काही प्लानिंग नाही किंवा कुठली बैठक होत नाही. मागच्या दहा वर्षात पंतप्रधानांनी त्यांच्या मनात काय आहे? यावर चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक बोलावल्याचे मला आठवत नाही. एनडीएमध्ये विश्वसनीयता उरलेली नाही.
वाजपेयी यांच्याकाळात एनडीएमध्ये योग्य पद्धतीने संबंध जपले जायचे. माझे वडिल एनडीएचे संस्थापक सदस्य आहेत. आम्ही एनडीए बनवली पण आज एनडीए नाहीय हे खूप दु:खद आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.