मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तुळजापुरातून सरकारला दिला.
त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शाहू राजांची गादी चालवणारे खासदार संभाजीराजे यांची एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची आहे, असंही विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं.
MPSC परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध
एमपीएससी परीक्षा स्थगित केली किंवा पुढे ढकलली तर नुकसान हे विद्यार्थ्यांच होणार आहे. बहुजन विद्यार्थी नुकसान करायचे का? मराठा समाजातील मुलांचं ही नुकसान होतोय याचा विचार केला पाहिजे, असा सांगत वड्डेटीवार यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास विरोधी सूर लावला.
समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतात…
संभाजीराजे असो वा प्रकाश आंबेडकर समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव करत आहे. त्याचा राजकीय फायदा कोणास व्हावा हा उद्देश आहे. हे राज्यातील जनतेला चांगल्याप्रकारे समजते , राजकीय पक्षाची झूल घालून कोण काय विधान करते, हे समजतं, अशी टीका देखील वड्डेटीवार यांनी केली आहे. दोन्ही राजांनी तडजोडीची भाषा केली पाहिजे, कोणत्या समाजाचे नुकसान व्हायला नको, असंही वड्डेटीवार यांनी यावेळी सांगितलं.
फडणवीस यांचा आरोप फेटाळला…
राज्य सरकार मराठा आरक्षण याबाबत वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, फडणवीसांचा आरोप वड्डेटीवार यांनी फेटाळला आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण याबाबत वेळकाढूपणा करत नाही, त्यांची वकील टीमच आमच्या सरकार काळात कोर्टात लढली आहे, अशी टीका वड्डेटीवार यांनी फडवणीस यांच्यावर केली आहे.
नेमकं काय म्हणाले, संभाजीराजे?
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असा घणाघाती आरोप संभाजीराजे यांनी यावेळी केला. आम्हला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत त्यांनी ठणकावलं.
विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं की, बहुजन लोकांसाठी आरक्षण देणाऱ्या राजाचे वारसदार वेगळी भाषा बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत इतर बलुतेदार होते. विरोध करणारे मोरे, जावळे होते, हा इतिहास आहे. राजाची भूमिका जनतेची हवी, केवळ एकाद्या समाजासाठी तलवार काढणे भाष्य योग्य नाही, अशा शब्दांत विजय वड्डेटीवार यांनी संभाजीराजेंना टोला लगावला.
आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरस्कृत नाहीत, असंही संभाजीराजेंनी यावेळी स्पष्ट केलं.
Read Also :
राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाहीhttps://t.co/jwybPJ5Jex#UdaySamant #RajThackarey
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020