मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यातील दोन मोठ्या राजकीय भेटी घेतल्याने दिवसभर चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे या दोन्ही भेटी शिवसेनेच्या नेत्यांच्या होत्या. या भेटींविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे याबाबत स्वतः नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.
गडकरींनी आज सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावर राजकीय चर्चांवर नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नितीन गडकरी म्हणाले, “मी मनोहर जोशींसोबत काम केलं होतं. अनेक दिवसांपासून भेटणं प्रलंबित होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने त्यांच्याकडे आज गेलो होतो. त्यांच्या पत्नीचा देहांत झाला होता, पण त्यावेळी कोव्हीडमुळे येऊ शकलो नाही. म्हणून आज व्यक्तिगत भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबीयांशी वैयक्तीक संबंध आहेत. आज वैयक्तीक चर्चा झाली. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण होते. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”
“गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गबाबत आढावा घेतला आहे. आता मोठ्या गॅपनंतर पून्हा एकदा आढावा घेतला. सध्या महाराष्ट्रात 523 प्रकल्प सुरू आहेत. एकूण 1 लाख 37 लाख कोटी रुपयांचे 14 हजार 409 किमी रस्त्यांची कामं सुरु आहेत. यासाठी आज 5 हजार 500 कोटी रुपयांची कामं मंजूर केली,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.
“दोन्ही पालखी मार्गांमध्ये 3 PKG चे काम सुरू झाले आहे. 5 PKG चे काम सुरू होणार आहे. हे उर्वरीत काम लवकरच सुरू होईल. पुण्यातील चांदणी चौकाबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई असा मार्ग करत आहोत. यामुळे उत्तर दक्षिण वाहतूक वेगवान होईल. नागपूर-हैद्राबाद महामार्गांचंही काम होणार आहे. एक वर्षाच्या आत मुंबई-गोवा मार्गाचे रूंदीकरणाचे काम पूर्ण होईल.”
मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले, “मी महाराष्ट्रात जास्त येत नाही. खूप दिवसानंतर आलोय. तुम्हालाच माहिती काम कसं सुरु आहे.” ईडीच्या मुद्द्यावर विचारलं असता ते माझं डिपार्टमेंट नाहीये, माझं डिपार्टमेंट रस्ते आणि वाहतूक आहे असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.