नवी दिल्ली : देशात एकीकडे महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाने चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुकांचे आयोजन केले आहे. यामुळे देशभरातून अनेक स्तरांवरून आणि माध्यमातून, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांवर आणि निवणूक आयोगावर टीका होत असून, केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी काल झालेल्या एका सुनावणीवेळी मद्रास उच्च न्यायालायने, राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी काय दिली जाते? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, देशातील महामारीच्या दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असं म्हणत निवडणूक आयोगाला फटकारलं आहे.
याचबरोबर न्यायालयाने, २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहात? अशी विचारणा करत, मतमोजणीवेळी महामारीचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्ल्यूप्रिंट सादर करा, अन्यथा मतमोजणी रोखली जाईल, असा इशार देखील निवडणूक आयोगाला दिला आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं भाजपने स्वागत केलं असून विधानसभा निवडणुका पार पडलेल्या सर्वच राज्यातील प्रमुखांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सभी राज्यों की भाजपा इकाइयाँ विधानसभा चुनावों और उप चुनावों के परिणामों के दिन चुनाव आयोग के आदेश और कोविड सम्बन्धी प्रोटोकालों का अक्षरशः पालन करेंगी।मेरा सभी कार्यकर्ताओं और देशवासियों से आग्रह है कि अभी अधिक से अधिक स्वास्थ्य सम्बंधी नियमों का पालन करे और जागरूकता बढ़ायें।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) April 27, 2021
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. २ मे रोजी निकाल असलेल्या सर्वच राज्यात आणि पोटनिवडणुकांच्या ठिकाणीही कुणीही विजयी सभा, मिरवणूक काढू नये. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आणि महामारी प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचना सर्वच राज्यांच्या प्रमुखांना दिल्याचेयांनी सागितले.