मुंबई: “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने काल(दि.२५) छापेमारी केली आहे. या घटनेचा केंद्र सरकारशी संदर्भ लावे चुकीचे आहे. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषय वळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील काही नेते करत आहेत,” असा आरोप विधान परिषद पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलाय. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विनाकारण वड्याचे तेल वांग्यावर काढू नये, असा टोलाही लगावला .
प्रविण दरेकर म्हणाले, “सीबीआयने २१ एप्रिल रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. पुन्हा एकदा त्यांच्या तपास प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांचा नागपुर येथील घरावर छापा टाकला असावा. यापूर्वीही कॉंग्रेसच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या अनेक कारवाया झाल्या होत्या. तेव्हा मात्र कोणताही संबंध सरकारशी जोडला गेला नाही. मग आता या कारवाईचा केंद्रातील भाजप सरकारशी संबंध लावणे योग्य आहे का? ”
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीशी केंद्र सरकारचा संदर्भ लावणे चुकीच आहे. मात्र बेताल वक्तव्य करुन "वड्यांच तेल, वांग्यावर काढण्याचा प्रयत्न" संजय राऊत करत आहेत. pic.twitter.com/rlaTyJvIGz
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 25, 2021
“कर नाही तर डर कशाला”
“ईडीचे काम आहे तपास करणे. या कारवाईपासून जितकं लांब जालं तितका संशय बळावत जाईल. कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही व छापेही टाकले जात नाहीत. या प्रकरणात अनिल देशमुख यांनी सामोरे जावे, तपास यंत्रणेकडून काही चुकीचं झालं तर न्यायव्यवस्था आहे,” असं दरेकर यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकण्याचा प्रकार म्हणजे सीबीआय, ईडी काय तुमचे कार्यकर्ते आहेत का? ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले, “राम मंदिराच्या जमिन व्यवहाराची ईडी चौकशी करावी, घोटाळ्याची चौकशी करा, अशाप्रकारची विधाने करुन वड्यांचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न संजय राऊत करताना दिसत आहेत. अंधाऱ्या रात्री चाचपडताना गोष्टी दिसत आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं असताना, अंधाऱ्या रात्री अशाप्रकारच्या गोष्टी झाल्या नाही तर चाचपडण्याचा सवालचं येत नाही. म्हणून कोणतीही सुडभावनेनं कारवाई न करता, स्वायत्ता यंत्रणेन कारवाई होत आहे.”