कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या नावाखाली ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह मुख्यसेविका यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बांधकाम, पाटबंधारे, शिक्षकांच्या मात्र बदल्या करण्यात आल्या. या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकांमुळे बदली पात्र व अपंग, आजाराने पीडित असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकला नसून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे सदस्य सुभाष घरत यांनी उपस्थित केला.
यावेळी केवळ ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह मुख्यसेविका यांच्या बदल्या रद्द करण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत, रद्द केलेल्या बदल्यांबाबत संशय व्यक्त करीत हेतुपुरस्सर काही विभागांना बदल्यांमधून वगळल्याचा आरोप देखील घरत यांनी केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
ठाणे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्या व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.