नवी दिल्ली : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. तरीही देशात दिवसाला सापडणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या तब्ब्ल २ लाखांच्यावर गेली आहे. यामुळे देशात आरोग्य सोयी-सुविधांचा तुटवडा जाणवत असून, परिणामी करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा, रुग्णवाहिकांचा, ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड्सचा अभाव असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसून येत आहेत.
महाराष्ट्रामध्येही काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांची करोना परिस्थिती अतिशय बिकट आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. “राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने करोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती. आज करोनाचे जे दुसरे तुफान उठले आहे, त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून करोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना, मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे,” असं म्हणत शिवसेनेने सामानातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, राज्यात हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.
शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात देखील गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३० हजारांच्यावर नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ कोटी ४५ लाखांवर पोहोचली असून, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ७५ हजार ६४९ वर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी १६ लाख ७९ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.