मुंबई : विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी 12 नाव ठरली आहेत. परंतु, ती गुपित आहेत ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्य वेळ आली की ती नावे आम्ही जाहीर करू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. विधान परिषदेवर 12 जणांची नियुक्ती केली जाणार आहे.
ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार
माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार आहे, अशी आवई उठवली जात आहे. आपल्या पक्षाची पडझड रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याची टीकाही अनिल देशमुख यांनी यावेळी केली.
पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच
राज्यात लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंत्रिमंडळाने 2 हजार 528 पदांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू होती. तेव्हाच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे 13 टक्के आरक्षणाचा मुद्दा सोडून लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
Read Also ;
शिवसेनेची पहले मंदिर फिर सरकार ची घोषणा कुठे गेली? प्रवीण दरेकरांचा सवालhttps://t.co/HNnPEwQBgh @mipravindarekar @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020