सिंधुदुर्ग – शिवसेनेच्या ११ आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची जाहीर घोषणा करणारे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीखुलं आव्हान दिले आहे. २०१९च्या निवडणुकीतून पळ काढणारे भाजप नेते नारायण राणे यांनी आगामी २०२४च्या निवडणूक रिंगणात उतरावं, मग शिवसेना काय आहे हे तुम्हाला समजेल, असं खुलं आव्हान सिंधुदुर्ग कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणे यांना दिलं आहे.
वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे कोकणात ११ आमदार देखील निवडून येणार नाही, त्यांना आम्ही घरी बसवू, अशी जाहीर घोषणाच केली होती. पण त्याच राणेंचा विधानसभेत पराभव माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर त्यांचा मुलाचाही दोन वेळा सलग पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेनं केला आहे, असा सणसणीत टोलाही वैभव नाईक यांनी लगावला.
राणेंना माहिती असेल जर गेल्यावेळी राणेंच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला नसता नसता तर तोही घरी बसला असता. खरंतर राणे जेव्हा जेव्हा आव्हान करतात त्या-त्या वेळी ते स्वत: त्यातून पळ काढतात. राणेंनी शिवसेना संपवण्याचे आव्हान केलं होतं, पण आता दुप्पट ताकदीने शिवसेना पक्ष वाढताना दिसून येत आहे. आता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे, असेही वैभव नाईक म्हणाले.