विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला वाढीव वीजबिलावरून धारेवर धरले आहे. नागपुरातील एका व्यक्तीने वाढीव वीजबिलामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर फडणवीसांनी सरकार ठाकरे सरकारला अनेक प्रश्न विचारत सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्या , अशी मागणी फडणवीसांनी केली आहे
नागपुरात लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचे बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होत.
यानंतर फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !” असे फडणवीस म्हणाले.