गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्य सरकारनं कोकणातील चाकरमान्यांना कोरोनाच्या नियमावलीतून काही प्रमाणात सूट देणात आली आहे. तसंच क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यात आलाय. त्याच धर्तीवर गणपतीसाठी गावाकडे जाणाऱ्या राज्यातील इतर गणेशभक्तांनाही सूट देण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.
शिवेंद्रराजे यांनी साताऱ्यांचे पालकमंत्री व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र लिहिलं आहे. सातारा व जावळी तालुक्यातील हजारो ग्रामस्थ नोकरीच्या निमित्तानं मुंबई, नवी मुंबईत राहतात. गणपतीसाठी हे सगळे मोठ्या संख्येने दरवर्षी गावाकडे येत असतात. कोविड १९ च्या संकटाच्या परिस्थितीत सरकारने घालून दिलेल्या अटी, नियमांचे पालन करणे प्रत्येकावरच बंधनकारक आहे. मात्र, १४ दिवसांचा कालावधी खूपच जाचक आहे. त्यामुळं त्यात काही प्रमाणात सवलत द्यावी, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रात म्हटलं आहे.