नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनारुग्ण संख्येने उच्चांक गाठला आहे. जगात सर्वाधिक नवे कोरोनारुग्ण भारतात आढळत असून, मृत्यूचा आकडा देखील प्रचंड वाढला आहे. जगभरातून भारतातील या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देश मदतीचा हात देखील पुढे करत आहेत. यातच आता पाकिस्तानमधून देखील भारतासाठी मदतीचा हात पुढे आला आहे.
पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मदतीचा हात पुढे केला आहे. एधी फाउंडेशनने भारताला 50 रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Edhi foundation offers 50 ambulances 🚑 to India
humanity stands first then anything else #PakistanstandswithIndia pic.twitter.com/qXKViVVI1G— the-Doctor-hassan (@thedochassan) April 23, 2021
एधी फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतात सध्या अनेकांना कोरोनासंदर्भातील संकटाला तोंड द्यावं लागत आहे. सध्याच्या या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये 50 रुग्णावाहिका पाठवू इच्छितो.
आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू. आरोग्य अधिकारी देखील सोबत असतील, असेही पत्रात म्हटले आहे. तसेच, भारताकडे परवानगी देण्याची विनंती केली आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे.