हिंगोली : भाजपचे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आज हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे कॉर्नर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. मुघल परवडले मात्र महाविकास आघाडी सरकार नको, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारात आता आरोप-प्रत्यारोप होतोना दिसत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही एका सभेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाची तारीख येते, तेव्हा तेव्हा यांचा वकील जात नाही, अर्णव गोस्वामीला आत टाकण्यासाठी जेवढी फौज वापरली जाते, ती आरक्षणासाठी केली असती तर? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी सत्तासाधाऱ्यांना विचारला आहे.
पदवीधरांची निवडणूक देखील जातीयवादावर होते आहे. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात कुठला प्रश्न सोडविला? महापोर्टलमध्ये झालेला गोंधळ कधी सुटेल, एमपीएससीच्या तारखा कधी जाहीर होतील यासाठी कधी विचारलं का? अनेक प्रश्न सोडविले नाही. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं, मात्र, यांनी त्यावर नेमकं काय केलं विचारा, मिळालेले अॅडमिशन बंद होत आहेत. तरीपण आपण यांना का निवडून देतो? अशाप्रकारे पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पदवीधरमधील विजय सरकार स्थापनेचा मुहूर्तमेढ; पंकजा मुंडे यांचे सुचक वक्तव्य
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपसह मित्रपक्षाचा विजय म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार असल्याचं सुचक वक्तव्य परभणीत पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यानंतर पंकजा यांनीही सरकार स्थापनेबाबत वक्तव्य केल्यानं भाजप खरंच सत्ता स्थापनेबाबत आखणी करतंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परभणीतील वेंकटेश मंगल कार्यालयात आज औरंगाबाद विभागीय पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंढेच्या नेतृत्वात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत ह्या पदवीधर निवडणुकीत भाजप पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा म्हणजे हा विजय सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरेल असे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Read Also :
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय
‘पाच वर्ष आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाणाऱ्यांवर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ’