मुंबई : राज्यात सचिन वाझे प्रकरणाने आधीच वातावरण तापलेले असताना, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, त्यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे राजकीय गोटात खळबळ उडवून दिली. त्यांनी या पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप केला.
आज या प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात झाली. यामध्ये मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली, तर अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना, आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, सीबीआयला या मुदतीमध्येच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
दरम्यान, यानंतर सर्वांचे लक्ष हे परमबीर सिंग यांच्या प्रतिक्रियेकडे लागले होते. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशांनंतर परमबीर सिंग यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाने १०० कोटींच्या वसुलीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देणे टाळले आहे. “आय हॅव नो कमेंट्स”, एवढ्याच शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने त्यांच्यावरील आरोपाची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असं जयश्री पाटील यांनी याचिकेत म्हटलं होतं. दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला लहिलेल्या पत्रात, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे लिहिले होते.