राम मंदिराच्या भूमिपूजनाने कोरोना जाणार का असा प्रश्न विचारत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. मात्र शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ‘जय श्री राम’ म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं. पार्थ पवार यांच्या या पत्रानंतर राजिक्य वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पार्थची ही वैयक्तिक भूमिका आहे. लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच “सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे? असा सवालही त्यांनी विचारला.
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. याबाबत पार्थ पवार यांनी ट्वीट करुन राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून ‘जय श्री राम’चा जयघोष केला. राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन केंद्र सरकार आणि पर्यायाने मोदींना टोला लगवणाऱ्या शरद पवार यांना पार्थ यांची भूमिका पटणार का असा प्रश्नही विचारला जात आहे.