टाळेबंदीमुळे सध्या बंद असलेल्या कांदिवलीच्या पावनधाम जैन उपाश्रयात हे साठ खाटांचे केंद्र पोयसर जिमखाना, भाजप व पावनधाम यांच्यातर्फे चालविले जात आहे.आजपर्यंत नऊशे कोविड रुग्णांना बरे करणारे पावनधाम केंद्र फक्त भाजप कार्यकर्ते चालवतात म्हणून ते महापालिकेला नको आहे का, असे असेल तर ते महापालिकेने चालवावे. केंद्रचालकांनीही ते चालवायचे असेल तर तसे ठरवावे, कोणीही तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असे सांगत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारनेही या पावनधाम केंद्राची प्रशंसा केली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्याचे कारण देऊन महापालिकेने नुकतेच हे केंद्र बंद करण्याची व तेथील रुग्ण अन्य महापालिका रुग्णालयांमध्ये हलविण्याची नोटिस दिली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी महानगरपालिकेच्या कामाबाबत नाराजी दर्शवली आहे.
पालिकेने ही नोटीस दिल्यावर हे केंद्र बंद करण्याचा निर्णय पावनधामतर्फे घेण्यात आला. पावनधाम च्या विश्वस्तांना हे केंद्र चालवायचे नसेल तर ठीक आहे, जागा त्यांची असल्याने आम्ही या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र त्यांना हे केंद्र यापुढे सहा महिने जरी चालवायचे असले तरी त्यांनी ते चालवावे.त्यांना अडवण्याची कोणतीही ताकद महापालिकेत किंवा अन्य कोणामध्ये नाही, यासंदर्भात सर्व व्यवस्था मी करेन, अशी हमी देऊन शेट्टी यांनी महापालिकेविरुद्ध दंड थोपटले आहेत.
केंद्र बंद करण्याच्या नोटिसा देणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. हे केंद्र बंद करण्याविरोधात सर्व लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्राला भेट देऊन येथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील केले होते.