नागपूर: जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितच लढण्याचा निर्णय सोमवारी घेतला. यासाठी सार्वत्रिक निवडणुकीतील फॉर्म्युला कायम ठेवण्यात येणार आहे. दोन्ही काँग्रेस आपआपल्या जागा कायम ठेवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार नाही अशी चर्चा होती.
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दुपारी शेतकरी संघाच्या सभागृहात बैठक झाली. यात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, राष्ट्रवादीच्या वतीने रमेश बंग, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते. १६ जागांवर पोट निवडणूक होणार आहे. ओबीसींसाठी राखीव जागेवर विजयी झालेल्या काँग्रेसच्या सात, राष्ट्रवादीचे चार, भाजपचे चार आणि शेकापच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यामुळे महाविकास आघाडी कायम राहणार नाही अशी चर्चा होती. जिल्हा परिषदेत सत्तेत वाटा देताना काँग्रेसने दुय्यम स्थान दिल्याने राष्ट्रवादी नाराज होती. सर्व पक्ष स्वबळावर लढतील असे चित्र होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ही कोंडी फुटली. सार्वत्रिक निवडणुकीत ज्यांच्याकडे जागा होत्या त्या त्यांच्याच पक्षाकडे राहणार आहेत.
नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा
भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर, तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
कुरबुरींनंतरही स्वबळाचा पुनरुच्चार
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता.