अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील लष्कराच्या के. के. रेंज विस्तारीकरणावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यावरुनच प्राजक्त तनपुरे यांनी सुजय विखेंवर टीका केली आहे.
अहमदनगरमधील के. के. रेंज विस्तारीकरण होणार नसल्याचे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सांगितलं आहे. त्यामुळे के. के. रेंज विस्तारीकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खरं बोलतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीपूर्वी कळेल, असे वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केलं होतं. त्यामुळे के. के रेंजच्या विस्तारीकरणावरुन संभ्रम निर्माण झाला होता. यावर तनपुरे यांनी विखेंना सडेतोड उत्तर दिलं आहे
“सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं,” असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.
“आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही, असे संरक्षण खात्याच्या प्रतिनिधींनी येऊन सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. याबाबत कोण काय बोलतं यात मला देणेघेणे नाही. जी काही वस्तूस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. जर यात अजून काही असेल तर सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं,” अशी प्रतिक्रिया प्राजक्त तनपुरे यांनी दिली.