पुणे : राज्यात करोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारने ५ एप्रिलपासून राज्यात नवीन करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. परंतु, या नियमावलीमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी, त्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. तसेच अनेक ठिकाणी प्रशासनाने एक तर राज्य सरकारने त्याविरुद्ध दुसरी अशा नियमावली जाहीर केल्या असल्याने, नागरिकांच्यात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान, या नव्या नियमावलीला राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आधी पाठिंबा तर नंतर विरोध दर्शवला. तसेच या नव्या नियमावलीमुळे व्यापारी, व्यवसायिक आणि दुकानदार यांचे कम्बरे मोडले आहे, त्यामुळे या नियमावलीची पुनर्मांडणी करावी, अशा आशयाचे पात्र देखील राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले.
भाजपप्रमाणेच, राज्यातील इतर प्रादेशिक विरोधी पक्षांपैकी एक असलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या, प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा राज्य सरकारच्या या निर्णयाला आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत बोलताना तीव्र विरोध दर्शवला.
इथे अनेक लोकांचे हातावर पोट आहे. या सर्व घटकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे आरोग्यमंत्री करोनाची ताकद कमी झाली हे सांगत आहेत, आणि दुसरीकडे लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय राज्य सरकार घेत आहे. मात्र, लोकांनी बगावत करण्याआधी ठाकरे सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, असा सूचक इशाराच त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला आहे.
यावेळी त्यांनी, लॉकडाऊनला आधी आम्ही विरोध केला, भाजप कॉपी कॅट आहे. प.बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा मास्क न घालता फोटो आहे. अमित शहा देशाचे मालक नाही, प्रत्येकजण मालक आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर आहात, अशी टीका भाजपवर केली.