कोरोनामुळे लोकांचे धर्मस्वातंत्र्य हिरावले जात आहे. लोकशाही टिकावी यासाठी, आमचं आंदोलन असल्याचं सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर पंढरपूर येथील विश्रामगृहात दाखल झाले आहेत. त्यांनी सांगितलं की, मंदिरावरही अर्थव्यवस्था अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारनं भाविकांचा फार अंत बघू नये. आम्ही मंदिराच्या दरवाज्यापर्यंत तरी जाऊ, असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. आमचे आंदोलन शांततेने असल्याने पोलिसांना आम्हाला सहकार्य करावेच लागेल. एकीकडे सरकार हॉस्पिटल, बाजारपेठ, एसटी सेवा सुरु करत आहे. मग मंदिरं उघडण्यास काय अडचण आहे. आता कोरोनाचा प्रभाव जानेवारी, फेब्रुवारीसारखा राहिला नाही. केंद्रानं उद्योजकांना 2 लाख कोटींची मदत केली आहे. राज्य शासनानं आलुतेदार, बलुतेदारांकडे लक्ष द्यावे, त्यांना दीर्घकाळासाठी प्रत्येकी किमान 25 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.