औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा भाजपचा डाव होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला हा विजय मान्य नसल्याचे म्हटले आहे.
ओरंगाबाद मधील पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता. पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली. पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम निवडणूक आयोग करत आहे. ईव्हीएम मशीन हे रिटर्निंग ऑफिसरच्या हातात असतात. त्या रिटर्निंग ऑफिसरकडून स्पष्टीकरण मागावं, अशी विनंती आपण न्यायालयाकडे करत असल्याचंही आंबेडकर म्हणाले.
बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे. करोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?, असा सवाल देखील त्यांनी विचारला.