मुंबई : इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. मात्र हा कार्यक्रम एमएमआरडीएने अचानक रद्द केला. या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याचे सांगितले. आता याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाला पुताळ्यांची नाही तर रुग्णालयाची गरज असल्याचे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर आपली भूमिका मांडत म्हणाले की, इंदूमिलचे पुन्हा आमंत्रण आले तरी जाणार नाही, देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशांचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यासाठी करावा.
इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन देखील बोलेल असे देखील आंबेडकर म्हणाले. तर दुसरीकडे, पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली आहे.