नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस 200 चा आकडा पार केला, तर भाजप 100 चा आकडा देखील गाठता आले नाही. या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तुफान प्रचार केला होता. मात्र तरीही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर आता राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी अमित शाहांवर टीकेची तोफ डागली आहे.
तृणमूल काँग्रेसच्या विजयबद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का दिला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी अस्वस्थ होत्या. त्यांनी मला फोन करून तातडीनं येण्यास सांगितलं. लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूलनं आपली रणनीती बदलली. ही रणनीती भाजपच्या फारशी लक्षात आली नाही. थेट लोकांशी जोडले जाणारे कार्यक्रम तृणमूलनं हाती घेतली. जमिनीवर अधिकाधिक काम सुरू केलं, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्य आधी प्रशांत किशोर यांनी भाजप 100 चा आकडा गाठणार नाही, असा दावा केला होता. त्यांचा हा दावा देखील खरा ठरला. प्रशांत किशोर यांनी अमित शाह हे ओव्हररेटेड राजकीय नेते असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले की, कदाचित माझ्या बोलण्यात तुम्हाला अहंकार वाटू शकेल. पण मला अमित शहा ओव्हर रेटेड राजकीय आणि निवडणूक मॅनेजर वाटतात. त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणतं व्यवस्थापन कौशल्य दाखवलं?, अस सवाल त्यांनी केला.
भाजप नेत्यांकडे खूप संसाधनं आहेत. संघ आणि पक्षाचं मोठं नेटवर्क त्यांच्याकडे आहे. सरकारी यंत्रणादेखील त्यांच्यामागे भक्कमपणे उभ्या आहेत. निवडणूक आयोगचे निर्णयदेखील त्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि तरीही ते हरले. यावरून तुम्हाला अमित शहांच्या नावलौकिकाची, प्रतिष्ठेची कल्पना येईल, असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला.