कोलकता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालचे आतापर्यंतचे कल पाहता तृणमूल काँग्रेस बाजी मारताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने २०४ जागांवर भक्कम आघाडी मिळवली आहे. तर २०० जागांचा दावा करणारा भाजप पक्ष अवघ्या ८३ जागांवर आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापनेचे स्वप्न होते. त्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत बंगालमध्ये भाजपने तीन आकडी संख्या ओलांडली तरी आपण आपले निवडणूक स्ट्रटेजीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिले होते. तसेच दोन मे निकालाच्या दिवसापर्यंत माझे हे ट्विट जपून ठेवा, असेही ठामपणे सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे ठरते की काय, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद झोकून दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे तेथील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी येथे प्रचाराचा धडाका लावला होता. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. पण हाती येत असलेल्या निकालानुसार भाजपला १०० चा आकडाही गाठणे अवघड दिसत आहे. मतमोजणीच्या सुरवातीच्या कलामध्ये भाजपच्या जागा १२४ वर दाखविण्यात येत होत्या. सकाळी ११ नंतर मात्र भाजपच्या जागा ९० च्या आसपास आल्या. त्याच वेळी तृणमुलच्या जागा या १६० च्या पुढे गेलेल्या होत्या.
ममता या नंदीग्राममधून पिछाडीवर असल्यातरी पक्षाला त्यांनी आघाडीवर ठेवल्याचे चित्र आहे. भाजपच्या जागा जेव्हा शंभरच्या पुढे होत्या तेव्हा अनेक भाजप नेत्यांना प्रशांत किशोर यांची आठवण झाली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आता प्रशांत किशोर यांनी आपले काम सोडून द्यावे, असा सल्ला दिला. मात्र हा सल्ला देऊन काही मिनिटे संपण्याच्या आतच भाजपचा आकडा हा १०० च्या खाली आहे.
प्रशांत किशोर हे या निवडणुकीत चर्चेत राहिले. बंगालमधील पत्रकारांसोबत केलेल्या चर्चेत त्यांनी भाजपची शक्तिस्थाने सांगितली आणि भाजपने येथे कसे पाय रोवले आहेत, याचे स्पष्टिकरण दिले होते. त्यावरून प्रशांत किशोर यांनी तृणमूलचा पराभव मान्य केल्याचा अर्थ काढला गेला होता.