मुंबई : कोरोनाच्या काळात खासगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने सुमारे 270 कोटी रुपयांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अत्यंत स्वस्त दरात कोरोना चाचण्या करण्याची सरकारी कंपन्यांची तयारी होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून जास्त दर आकारणाऱ्या खासगी कंपन्यांना मोकळे रान दिले, असाही आरोप त्यांनी केला.
ऑगस्ट महिन्यात खासगी लॅबधारकांना शासनाने स्वॅब चाचणीसाठी 1900 ते 2200 रुपये दर मंजूर केला होता. म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान खासगी लॅब धारकांनी प्रत्येक चाचणीमागे साडेबाराशे रुपये जास्त आकारले. आतापर्यंत राज्यात 50 लाख चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 19 लाख 34 हजार चाचण्या खासगी लॅबमधून झाल्या. त्याद्वारे त्यांनी 242 कोटी 92 लाख रुपयांची लूट केली, असा आरोपही दरेकर यांनी केला.
भारत सरकारच्या कंपनीने राज्य सरकारला 19 ऑगस्ट रोजीच ही चाचणी 796 रुपयांत करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सरकारने हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला. तो मान्य केला असता तर जनतेचे कोट्यवधी रुपये वाचले असते, असेही दरेकर म्हणाले.या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.