पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत. दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडे सातत्याने हे सरकार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या सरकारला कोणताच धोका नसल्याचे म्हटले जात आहे. आता आणखी एक भाजप नेत्याने हे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा केला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या नंतर राज्यात भाजपचे सरकार येईल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होत्या. हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे सरकार देईल असं वाटत होतं. परंतु, या सरकारने काहीच दिलं नाही. जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या, असं सांगतानाच या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. ही निवडणूक झाल्यावर राज्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा त्यांनी केला.
पवार कुटुंब लेकराबाळासकट पंढपुरात आहे. त्यांचा साखर कारखान्यावर डोळा आहे. यांचं राजकारण केवळ श्रीमंतांसाठी आहे, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली.