नवी दिल्ली : ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही कोरोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास सरकारकडून परवानगी देण्यात आल्यानंतर आता याच्यावरून राजकारण सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. लवकरच देशात लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी कोरोनाची लस टोचून घ्यावी, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
ज्या प्रमाणे लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी सुरुवातीला लस टोचवून घेतली. त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची लस सुरुवातीलाच टोचवून घ्यावी, असे बिहारमधील काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्वात प्रथम लस टोचून घेतल्याने या लसीवर जनता विश्वास ठेवेल, असे अजित शर्मा म्हणाले.
तर दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही’, असे वक्तव्य केले आहे.