मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या परिस्थितीवरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात टीकायुद्ध सुरु असलेले पाहायला मिळत आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली असून, देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे.
यातच आज नागपूर शहरात राष्ट्रवादीकडून, सीबीआयच्या कारवाईचा निषेध, तसेच केंद्र सरकार आणि राज्यातल्या भाजपच्या विरोधात मोर्चे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी या सगळ्या गोष्टी कुणाच्या सांगण्यावरून होत आहेत याची आम्हाला माहिती आहे, न्यायालयाने केवळ १५ दिवसांच्या प्राथमिक चौकशीनंतर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना, एकाएकी छापेमारी सुरु होऊन, माजी गृहमंत्र्यांवर एफआयआर कशी दाखल होते, असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून केला गेला.
तसेच, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे मिळून राज्यातील सरकार पाडण्याचा डाव रचत आहेत, हे त्यांना कधीही शक्य होणार नाही. त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहणार, असे सांगत केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपच्या नावाने निषेधार्ह घोषणा देण्यात आल्या, तर दुसरीकडे अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ जोरदार आरोळ्या ठोकण्यात आल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.