पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. एल्गार परिषदेच्या आयोजनाबाबत पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज आयोजकांनी केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारली आहे.
कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे कारण देत पोलिसांकडून परिषदेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
Maharashtra: Pune City Police denies permission to hold Elgar Parishad event on 31st December.
Several activists had applied for permission to hold the Elgar Parishad event, where several known activists were scheduled to participate in a closed-door program.
— ANI (@ANI) December 23, 2020
एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे.
डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पास असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून, नागरिकांना या ठिकाणी येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात कोणत्याही संस्था आणि संघटनांना फलक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.