पुणे : गेली 8-10 दिवसांपासून शहरात रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत आहे. सातत्याने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा करत आहोत. पैसे खर्च करण्याला कोणाचीही अडचण नाहीये. रुग्णांच्या नातेवाईक औषधासाठी वणवण फिरत आहेत. रुग्णसंख्या वाढत आहे, रेमडेसिव्हीर उपलब्ध नाही. नातेवाईक हतबल झाले आहेत. या स्थितीमध्ये राज्य सरकारचे अन्न आणि औषध प्रशासन विभाग काय करत आहे ?, असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहरात कोरोनारुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. रेमडेसिव्हीर औषधासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
राज्य सरकार रेमडेसिव्हीरचा साठा उपलब्ध का करू शकत नाही. गेली 10 दिवसांपासून हे सुरू आहे. ही कुठली प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे ? अन्न आणि औषध प्रशासन विभाग पुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. ते टिव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
महानगरपालिका म्हणून आम्ही कुठल्याही व्यवस्थेत कमी पडलो नाही. जेथे जेथे राज्य सरकार म्हणून ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, त्या होताना दिसत नाहीत. ससून हॉस्पिटलची क्षमता 1750 बेड्सची असताना, 500 बेड्सच्या पुढे जातच नाही. लोकांना टेस्टिंग केलेले रिपोर्ट देखील लवकर मिळत नाहीत. ससूनमध्ये टेस्टिंगची क्षमता तुम्ही का वाढवत नाही ? , असा सवाल देखील त्यांनी केला.