गणेशोत्सवाआधीपासून चर्चेत राहिलेल्या विसर्जनाच्या मुद्यावरून आता राजकीय खडाखडी सुरु झाली आहे. विसर्जनासाठी पुरविलेल्या फिरत्या हौदांसाठी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याचा मुद्दा उपस्थितीत करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोप महापौर मुरलीधर मोहोळांनी फेटाळून लावले आहेत.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर साधेपणाने विशेषत: घरीच गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले आहे. त्याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कचरा साठविण्याचे कंटेनर असल्याचा आरोप करीत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आंदोलन केले होते. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे
जगात कोणचं श्री गणेशाच्या विसर्जनासाठी कचऱ्याचे कंटनेर वापरणार नाही, मात्र तसा समज जे पसरवत आहेत, अशा विघ्नसंतोषीं लोकांना आम्ही किमत देत नाही, अशा शब्दांत महापौर मोहोळ यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी मनसेच्या नेत्यांवर आगपाखड केली आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, “पुणेकर साधेपणाने आणि अत्यंत संयमाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यांना पुरविलेल्या सुविधांबाबत नागरिकांची तक्रार नाही. मात्र केवळ राजकीय भावनेतून विघ्न आणून वातावरण बिघडविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. अशांना आम्ही जुमानत नाही,”
एकाबाजूला मनसेची भूमीका खोटी असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगत आहेत. त्याचवेळी फिरत्या हौदांसाठी वापरलेल्या यंत्रणेची चौकशी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रकरणातील दोषीवर कारवाईची मागणी मनसेने आयुक्तांकडे केली आहे.अशा वागण्यातून आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला महापौरांनी मनसेच्या नेत्यांना दिला आहे.