अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून लसींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. लसीचा अधिकाधिक पुरवठा करण्याची मागणी ठाकरे सरकार करत आहे, तर केंद्राकडून सर्वाधिक लस महाराष्ट्रालाच देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील ‘केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असतं का?’, असा सवाल करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, लस पुरवठ्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत, तर दुसरीकडे राज्य लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगून पाठ थोपटून घेत आहेत. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? केंद्राच्या सहकार्याशिवाय लसीकरणात राज्याला प्रगती करता आली असती का?, असा सवाल त्यांनी केला.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. असे असतानाही केंद्र सरकार लसीकरणात दुजाभाव करते हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेतय. मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले का ?, असा प्रश्न विखे पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील रेमडेसिव्हिरचा साठा नगरमध्ये वाटला होता. यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे म्हणत विखे पाटील यांनी बोलणे टाळले.