नोटबंदीला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट केले आहे. राहुल गांधी म्हणाले, प्रश्न हा आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था हिंदुस्थानच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वेत्तम होती. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे कारण कोरोना असल्याचे सरकारकडून सांगितले जाते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव तर बांगलादेशातही आहे. इतरही देशांमध्येही आहे. मग हिंदुस्थानच मागे कसा राहिला?
पंतप्रधान म्हणाले होते की, आम्ही काळ्या पैशाविरोधात लढू; परंतु हा लढा काळ्या पैशाविरोधात नव्हता. हा हल्ला तुमच्यावर होत आहे, पंतप्रधान तुमच्याकडून पैसे काढून घेऊन आपल्या ठराविक दोन-तीन मित्रांना देऊ इच्छित आहेत. नोटबंदीदरम्यान तुम्ही लाईनमध्ये उभे होता. परंतु मोदींचे मोठे उद्योगपती मित्र मात्र उभे नव्हते. तुम्ही तुमचे पैसे बँकांमध्ये टाकले आणि मोदींनी बँकांमधील ते पैसे आपल्या मित्रांना देऊन टाकले. त्यांची कर्जे माफ केली. त्यांचे 3 लाख 50 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.