पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघातील ‘भाऊ’ बली आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी ‘हूल’ दिली आहे. वाकड-पुनावळे प्रभागातील रस्त्यांच्या विकासकामांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘अभय’ दिल्यामुळे शिवसेनेचे कलाटे भाजपाच्या जगतापांवर वरचढ झाले आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना गटनेते कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना आव्हान दिले आहे. २०१४ मध्ये शिवसेना आणि २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवत कलाटेंनी जगताप यांना ‘पर्याय’ निर्माण केला. मात्र, सलग दोनदा पराभव झालेला असतानाही कलाटेंनी ‘नार्वेकर कनेक्शन’ द्वारे शिवसेनेतील दबदबा आणि जगतापांचा कडवट विरोध कायम ठेवला आहे.
दरम्यान, वाकड-पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधील सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते विकासाबाबत जगताप आणि कलाटे यांच्या चढाओढ सुरू आहे. पाच पैकी तीन रस्त्यांना सत्ताधारी भाजपाने स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली होती. मात्र, उर्वरित दोन रस्त्यांचा विषय फेटाळून लावला होता. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर जगताप समर्थक पदाधिकारी-नगरसेवकांचा ‘दबाव’ होता अशी चर्चा आहे.
वाकड आणि पुनावळेतील या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव आल्यानंतर सभापती संतोष लोंढे यांनी काँक्रिटीकरणाची कामे खर्चिक असल्याने डांबरीकरण करण्यासाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांना दिले होते. त्यावर आयुक्तांनी आपल्या अधिकारात हा विषय राज्य सरकारकडे पाठवला. तसेच, फेटाळलेल्या विषयाचा वस्तुनिष्ठ अहवाल नगर विकास विभागाला सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री अथवा नगरविकास विभाग कार्यालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. राहुल कलाटे यांनी प्रभागातील रस्त्यांबाबत आता महाविकास आघाडीची मदत घेतली आहे. किंबहूना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात महाविका आघाडी सरकार कलाटेंना ताकद देत आहे, अशी चर्चा आहे. वास्तविक, संबंधित विकास कामांचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवण्यासाठी कलाटेंनी मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्तांवर दबाव आणला आहे, असाही तर्क लढवला जात आहे.
करोडो रुपये विकसन शुल्क देणाऱ्या क्षेत्रात सुविधा नको ?
वाकड- पुनावळे प्रभागात ताथवडे व वाकड हद्दीवरील शनी मंदिरपासून मारुंजी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. हिंजवडी आयटी पार्क व मुंबई-पुणे-बेंगलोर हायवेजवळ असलेला हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. रहिवाशी क्षेत्र वाढत असल्यामुळे गृहनिर्माण संस्था निर्माण होत आहेत. त्याअंतर्गत करोडो रुपयांचा विकसन शुल्क मनपाकडे जमा होत आहे. त्यामुळे या भागात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, राजकीय चढाओढीत रस्ते विकासाला खिळ घातली जात आहे, असा सूर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे.
Read Also
एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?https://t.co/VRx2QdJ908#SharadPawar #EknathKhadase #BJP #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020