मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे हे कोणत्याही एका गोष्टीवर ठाम नसतात. त्यांच्या भूमिका सतत बदलत राहतात, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्च महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे.
या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर उपरोधिकपणे निशाणा साधला. आतापर्यंत मनसेने नेमकी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरे यांनाही सांगता येणार नाही. मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांचं एक ठाम असं काही नसतं, असे सचिन सावंत यांनी म्हटले. त्यामुळे आता ‘मनसे’कडून काँग्रेसच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.
9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील, असेही नांदगावकरांनी सांगितले. याशिवाय, निवडणुका जवळ आल्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.