मुंबई : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रात दररोज 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळू लागले आहे. नागरिकांनी मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टेंसिंग, कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन सातत्याने सरकारकडून केले जात आहे. एवढेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास त्याच्याकडून दंड देखील आकारला जात आहे. मात्र या दंडाला एक व्यक्ती अपवाद आहे ती म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना दिसून आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते सर्वच नेत्यांनी राज ठाकरेंना मास्क घालण्याचे आवाहन देखील केले. कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या काळात अनेक लोक मदतीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र तेथेही राज ठाकरेंनी मास्क लावलेला दिसला नाही.
मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केले होते. एका कार्यक्रमात राज ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी देखील त्यांनी मास्क लावला नव्हता. याबाबत त्यांनी प्रश्न विचारला असता, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो, असे थेट उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या. राज ठाकरेंचा नाशिक दौरा देखील याच कारणाने गाजला. एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना ‘मास्क काढा’ अशा सूचनाही दिल्याने याची अधिकच चर्चा झाली.
मास्क न लावल्या सर्वसामान्यांना दंड, मात्र राज ठाकरेंना का नाही ? असा प्रश्न विचारलो जातो. राज ठाकरे मास्क वापरत नाही असे मुख्यमंत्री ठाकरेंना विचारल असता त्यांनीही ‘राज ठाकरे यांना माझा नमस्कार सांगा.’, असे उत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील वारंवार त्यांनी मास्क घालण्याचे आवाहन केले. तर काही नेत्यांनी थेट पत्रच लिहिले. एवढेच नाही तर, राज ठाकरे मास्क का घालत नसावे, याचे कारण देखील केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश राज यांना पाळायचे नसतील, म्हणून ते मास्क घालत नसावेत, असा तर्क आठवले यांनी मांडला. राज ठाकरे रोरोसेवेतून रायगड जिल्ह्यात जात असताना मास्क परिधान न केल्याबद्दल त्यांच्याकडून दंड आकारण्यात आल्याचे देखील बातम्या समोर आल्या. मात्र नंतर या बातम्या फेटाळण्यात आल्या.
राज ठाकरेंच्या मास्क न वापरण्याच्या भूमिकेविरोधात एका वकिलाने तर थेट पोलीस ठाण्यात तक्रारच दिली. विनामास्क फिरण्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला अशी तक्रार अॅड.रत्नाकर चौरे यांनी केली.
त्यातल्या त्यात कौतुकास्पद म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9 मार्चला असल्याचा पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी आणि कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता हा निर्णय मनसेने घेतला.
एकीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असताना राज ठाकरेंचा मास्कद्वेष नक्की कशासाठी आणि त्यांना मास्कचे वावडे का ? असा सवाल विचारला जात आहे.