मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयावर भाष्य केलं. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजणारा राजकीय मुद्दा म्हणजेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे खरंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. पण, राज ठाकरे म्हणाले की, माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नाही, ती बॉम्बची गाडी ठेवली कुणी हा खरा महत्त्वाचा विषय आहे
गेल्या 21 मार्चलाही राज ठाकरेंनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली होती. तेव्ह ते म्हणाले होते की, सचिन वाझेप्रकरण आणि अनिल देशमुख यांनी दिलेलं कथित 100 कोटींचं टार्गेट, या प्रकरणाची चौकशी केंद्राने करावी. तसेच, त्यांनी सचिन वाझेवरुनही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना घेरलं होतं. .
“माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसांनी बॉम्बची गाडी ठेवली. त्याची चौकशी होणार आहे का? उद्या याने राजीनामा दिला चौकशी सुरु झाली, मग तुम्ही विसरुन गेलात. तुमच्या बातम्या बंद झाल्या, मग सगळेच विसरुन जाणार.”
“विषय हा आहे बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असं कृत्य करणार नाहीत. पण चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी.” असे राज ठाकरे म्हणाले. “आपण तिसरीकडे जातोय. प्रत्येक वेळी हेच होते. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो आणि कशापासून सुरु होतो हे आपण पाहातच नाही.” “सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी.. कशाचा कशाशी संबंध?” तसेच “परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच.” असा अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.