मुंबई : राज्यातल्या करोना परिस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शनिवारी रेमेडीसीवर इंजेक्शन्सचा पुरवठा करणाऱ्या ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि काही नेते, हे विलेपार्लेच्या बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. यावरून सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरु आहे.
एकीकडे सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर भाजप नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, आज या प्रकरणावरून अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एक खुलासा केला आहे. त्यांच्या या खुलास्याने ठाकरे सरकार तोंडघशी पडलं आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, मागील आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत मला भेटले आणि निवेदन दिलं. निर्यातदारांकडे साठा होता, तो संकटकाळात राज्याला मिळत असेल या स्वच्छ हेतूने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने त्यांना परवानग्या दिल्या. त्यानंतर कंपन्या त्यांच्याकडील साठा राज्य सरकारलाच देऊ शकत होते मात्र इतर कोणालाही देऊ शकत नव्हते. दरम्यानच्या काळात काही घडामोडी झाल्या त्यात वेगळं राजकारण झालं. मला यावर जास्त काही बोलायचं नाही. पण महामारीचा मुकाबला करण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करायला हवं.
यावरून ठाकरे सरकारवर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. भाजपाच्या माध्यमातून या गोष्टी होत आहेत, हे कळल्यावर सरकारचा अहंकार जागा झाला. लोकांच्या जीवापेक्षा राज्य सरकारला स्वत:च्या अहंकारातच जास्त रस आहे. रेमडेसिवीर टेंडर काढून कोट्यवधीच्या कमिशनचं नुकसान होईल म्हणून हे कुभांड रचलं गेलं. दुपारी मंत्री धमकी देतात आणि रात्री एका दहशतवाद्याला अटक करावी तसं कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतलं जातं. आता राजेंद्र शिंगणे यांनी सांगितल्यावर या सर्वांचा डाव उघड झाला, असा टोला देखील प्रविण दरेकर यांनी सरकारला लगावला आहे.