मुंबई : मोदी सरकारने काही दिवसांपुर्वीच पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात आज देशभरात शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांकडून या विधेयकाला प्रामुख्याने जोरदार विरोध पाहण्यास मिळत आहे. देशातील 31 शेतकरी संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे.
दुसरीकडे, आजच एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोणला ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चौकशीसाठी बोलवले आहे. शेतकरी आंदोलनाऐवजी माध्यमांमध्ये दीपिका पादुकोणच्या चौकशीला अधिक महत्त्व दिले जाईल व शेतकरी आंदोलन दाबण्यासाठीच दीपिकाला आज चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची टीका होत आहे. माजी खासदार राजू शेट्टींनी देखील आता शेतकऱ्यांचा सरकारविरोधी रोष दाबण्यासाठीच एनसीबीने दीपिकाला आज चौकशीला बोलावल्याचा आरोप केला आहे.
शेतकर्यांना दाखविण्याऐवजी दिपीकाच्या चेह-यावरच फोकस करून बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप आहे. @ANI@ncb
— Raju Shetti (@rajushetti) September 24, 2020
राजू शेट्टी यांनी ट्विट केले की, दीपिका पादुकोणला एनसीबीनेने 25 सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावले आहे. कारण याच दिवशी देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. माध्यमांनी आंदोलन करणाऱ्या करपलेल्या चेहऱ्यांच्या शेतकऱ्यांना दाखवण्याऐवजी दीपिकाच्या चेहऱ्यावरच फोकस करुन बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप आहे.
दरम्यान, काँग्रससह सर्व विरोधी पक्षांना या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’, ‘अखिल भारतीय शेतकरी संघटना’, ‘भारतीय किसान संघटना’, ‘अखिल भारतीय किसान महासंघ’ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.