प्रतिनिधी: विवेक पानमंद
पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राजकारण चांगलेच जोर धरू लागले आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात मुख्य लढत होईल असे वाटत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी उमेदवार दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंच झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंढरपूर मध्ये तळ ठोकला आहे. शेतकऱ्यांच्या हालापेष्टांना केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतून राज्य आणि केंद्र सरकारचा एकाच वेळी काटा काढायची संधी मिळाली आहे. एफआरपी थकविणाऱ्या उमेदवारांचा काटा काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमदेवारास संधी द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले .
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारनिमित्त शेट्टी हे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील अरळी येथील सभेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, तानाजी बागल, विष्णुपंत बागल, रणजित बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शहराध्यक्ष हर्षद डोरले, अनिल बिराजदार, शंकर संगशेट्टी, अनिल अंजुटगी, आप्पासाहेब पाटील, सिद्धाराम व्हनुट्टगी, बाळासाहेब कपले उपस्थित होते .
राजू शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्ज झाले तरी त्यांना तोंड लपवावे लागते. नाहीतर खर्चात काटकसर करावी लागते. इथे मात्र शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम थकवून उमेदवारांच्या खर्चात मात्र काटकसर नाही. शेतकऱ्यांच्या एफआरपीची कोट्यवधीची रक्कम थकवून निवडणूक खर्चासाठी मात्र दोन्ही पक्षाच्या उमेदवाराकडे पैसे आहेत. पाच वर्षे पैसे गोळा करायचे आणि ते पैसे निवडणुकीवर खर्च करायचे, अशाचा काटा काढायची संधी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली आहे. “शेतकऱ्यावरील अन्यायावर हे पक्षीय उमेदवार रस्त्यावर उतरले नाहीत, तर पहिल्यांदा रस्त्यावर उतरण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे आता मी एकटा कुठे कुठे पळणार, यासाठी शेतकऱ्यांची फौज तयार केल्याशिवाय पर्याय नाही. केंद्र आणि राज्य सरकार हे आपले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.