जळगाव : एकीकडे कोरोनाचे संकट असताना अनेक अडचणींचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची गेल्या वर्षीच्या किमती पेक्षा भाव वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकट घोंघावत असतानाच खताच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांवर जणू ‘तंगित तेरावा महिना’ ओढवल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन त्यांची चिंता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची दर वाढ त्वरित मागे घेऊन खतांच्या भावावर नियंत्रण आणण्याबाबत खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
कोव्हीड महामारीच्या दुसऱ्या लाटे दरम्यान व मागील वर्षा पासून सुरु असलेली ही महामारी आता वेगाने पसरत आहे व त्यामुळे शेतकरी आधीच विपरीत परिस्थितीशी सामना करत आहे. त्यामध्ये मागील वर्षात पिकलेले धान्य व इतर शेती पिकांना योग्य असा भाव पण मिळाला नसल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता ह्या नवीन खरीप हंगामासाठी शेती कामाचे नियोजन गोंधळात आहे. त्यामध्येच खताची ही भाव वाढ म्हणजे दुष्काळात तेरवा महिन्या सारखे आहे.
रासायनिक व उर्वरक मंत्री केंद्र सरकार यांना रक्षा खडसे यांनी विनंती करत रासायनिक खताची ह्या वेळेस केलेल्या भाव वाढ हि पूर्णतः मागे घ्यावी व कोव्हीड महामारीच्या या देशात आलेल्या विपरीत परिस्थिती जोपर्यंत सामान्य होत नाही तो पर्यंत अशी कुधालीही रासायनिक व मिश्र खते यांची भाव वाढ होऊ नये, यासाठी लागणारे उपाय योजना करावी जेणे करून शेतकऱ्यांवर कुठलाही नवीन भार पडणार नाही व शेतकरी बांधव ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा आपल्याला शेती पिके उपलब्ध करून देईल.
त्यामुळे माझी केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे की सध्या तरी रासायनिक व मिश्र खते यांची भाव वाढ हि पूर्णतः मागे घ्यावी व मागील वर्षी असलेल्या किमंती मध्येच राज्याच्या केलेल्या मागणीनुसार वेळेवर साठा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर व रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे रक्षा खडसे यांनी यावेळी पत्राद्वारे केली आहे.