मुंबई : . थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या, असं आव्हान भाजपचे आमदार राम कदम यांनी राऊत यांना एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलं आहे.
संजय राऊत का त्रागा करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. त्यावर राऊतांनी बोललं पाहिजे. सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. थातूरमातूर उत्तरं देऊ नये, असं सांगतानाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही ते राऊतांनी सांगावं, असं कदम म्हणाले.
दरम्यान, अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात आर्थिक हितसंबंध होते. त्यांच्यात जमिनीचा व्यवहार झाला होता, असा गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलेच फटकारले आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी फडफड करत आहेत. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. मात्र, किरीट सोमय्या यांनी कितीही फडफड केली तरी त्यामधून काही निष्पन्न होणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.