मुंबई : एकीकडे राज्यात आणि देशभरात करोना परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. करोना बाधित रुग्णांचा झालेला उद्रेक आणि परिणामी आरोग्य सुविधांची निर्माण झालेली कमतरता, यामुळे राज्य सरकारची त्रेधातिरपीट उडालेली असताना, दुसरीकडे सचिन वाझे, मनसुख हिरेन, अनिल देशमुख आणि परमबीर सिंग या नावांशी संबंधित प्रकरणांमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर लावला आहे. देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधले सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करत परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर यावर निकाल देताना अनिल देशमुख यांच्याविरोधात १५ दिवसांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते मात्र, याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालायचा निकाल कायम राखला. आता देशमुखांना सीबीआयने समन्स बजावले आहे. 14 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.