पंढरपूर : अतिशय चुरशीच्या ठरलेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का दिला. भाजप उमेदवार समाधान आवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. या निकालावर आता भाजप नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना राज्यात लवकरच सत्तांतर होणार असल्याचे म्हटले आहे.
ये तो सिर्फ बाकी है, पुरा महाराष्ट्र बाकी है ! फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता करेक्ट कार्यक्रमाची सुरुवात झालीये. तुम्ही आता दिवस मोजायला लागा. राज्यात 100 टक्के सत्तांतर होणार, अशी प्रतिक्रिया रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपुरच्या निकालानंतर दिली आहे.
उजनी पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, उजनीच पाणी चोरणाऱ्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचा राजधर्म पाळायला पाहिजे. पंढरपूरच्या जनतेने दाखवून दिले आहे की महाराष्ट्र भाजपच्या पाठीमागे आहे.
अजित पवारांच्या तिजोरीची दारं फक्त बारामतीसाठी खुली होतात. इतर ठिकाणी माणसं नसून जनावरं आहेत, असे त्यांना वाटते. सोलापूर, साताऱ्यासाठी कुठलंही भरीव काम त्यांना करता आलेले नाही, अशी जोरदार टीका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली.