औरंगाबाद – गेल्या 24 तासापासून प्रहारचे कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढून रावसाहेब दानवेंच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीविरोधात शिवाजीनगर पाण्याच्या टाकीला पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. “केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. जर दुपारी 4 वाजेपर्यंत माफी मागितली नाही, तर आम्ही पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु,” असा इशारा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
या आंदोलनाची माहिती मिळताच रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी प्रहारच्या आंदोलनाला भेट दिली. हर्षवर्धन जाधव हेही पाण्याच्या टाकीवर दाखल झाले. यावेळी त्यांनी रावसाहबे दानवे यांच्यावर खरमरीत टीका केली.
रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच ते पुढे आले आहेत. यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचे शेतकरी विरोधातील विधान असून त्यांनी शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी दुपारी प्रहारच्या जलकुंभावरील ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन केली.