जालना: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या खास वक्तृत्व शैलीसाठी ओळखले जातात. सभा असो किंवा पत्रकार परिषद ते आपल्या गावकरी शैलीतूनच बोलत असतात. अशाच शैलीत रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात तुफान टोलेबाजी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संतोष दानवे, उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय तसेच व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, व्यक्तींच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी दानवे म्हणाले की काही जण मला साधा भोळा म्हणतात. यामध्ये किती खरे आहे किंवा खोटे आहे हे त्यांनाच माहित. जालना शहरातील एका बँकेत गेलो तर माझा उल्लेख लोकांनी याच्यासारखा साधा-भोळा केंद्रीय मंत्री नाही असा केला. मी माणसांच्या टकरा लावणारा माणूस मात्र मला रेड्यांच्या टकरा लावण्याचे निमंत्रण देतात.
मी जळगावहून येत असताना मला जालना शहरातून एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने सांगितले त्याचा सासरा रेल्वेने जालना येथे येत आहे आणि संबंधित रेल्वेगाडी तीन क्रमांकाच्या फलाटऐवजी एक क्रमांकाच्या फलाटावर आणायला सांगा. आता मी काय चालकाला आवाज देऊन हे काम करायला लावू का ?. दुसऱ्या दिवशी हीच व्यक्ती मला भोकरदनला भेटायला आली आणि सांगू लागली की तुमच्यामुळे गाडी एक नंबरच्या फलाटला थांबली आणि माझ्या सासऱ्यांसमोर तुमच्यामुळे माझी इज्जत वाचली.
मीही त्याला म्हणालो की पुन्हा अशी कामे सांगत जाऊ नका. गाडी चालवणारा एकटाच नव्हता मात्र तुझ्यासाठी करावं लागलं. हे सांगितल्यानंतर उपस्थितांना आपलं हसू आवरता आलं नाही. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा संदर्भ देऊन दानवे म्हणाले, सत्तारसेठ बदनापूरच्या फाट्यावरून चालले असताना रस्त्यातील रेल्वेगेट लागले. त्यांचा फोन आला.
आधा घंटा हुआ, अब गेट खोलने को लगाना. भोकरदनचा एक काँग्रेस कार्यकर्ता आणि दहा जण द्वितीय श्रेणीची तिकिटे काढून रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात बसले. तिकीट तपासणीस आल्यावर त्यांनी त्याला सांगितले की, आम्ही दानवेंच्या गावचे आहोत. आणि त्याच्या हातात मला जोडून दिलेला मोबाइल दिला. मग मी तिकीट तपासणिसास सांगितले की, द्वितीय श्रेणी आणि वातानुकूलित डब्याच्या तिकिटातील फरकाची रक्कम त्यांच्याकडून घ्या आणि प्रवास करू द्या.