केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध उद्या भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी अशा अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेत, शेतकरी आंदोलनात निमंत्रण मिळत नसल्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व राखण्यासाठी कृषी कायद्याला विरोध सुरु असल्याचा आरोप केला आहे.
मोदी सरकारचा विरोध करणं हे एकमेव काम आता विरोधकांकडे शिल्लक राहिल्याचा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे. कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना ज्या काही शंका आहेत, त्यावर चर्चा सुरु आहे. मात्र अनेक विरोधी पक्षांनी अचानक उडी घेतल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला आहे.
रविशंकर प्रसाद यांचा पवारांवर निशाणा
शरद पवार यांनी आपल्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यातील शिला दीक्षित यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवत रविशंकर प्रसाद यांनी पवारांवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. तेव्हा पवार यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कृषी कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक आणि शेतकऱ्यांना आपलं उत्पादन कुठेही विकण्याचा अधिकार मिळावा असं लिहिण्यात आलं होतं.
त्याचबरोबर शरद पवार यांना 2005 मध्ये एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचा आणि त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तराचा दाखलाही प्रसाद यांनी दिला. अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट अॅक्ट कधी संपणार? असा तो प्रश्न होता. आणि त्यावर सहा महिन्यात परिणाम दिसतील आणि मार्केट अॅक्टमध्ये सुधारणा केली नाही तर भारत सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळणार नाही, असं उत्तर पवारांनी दिल्याची आठवण प्रसाद यांनी करुन दिली
शरद पवार तुम्ही अनुभवी नेते आहात. अनेक वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रांत मंत्री होता. तेव्हा तुम्ही कृषी धोरणातील सुधारणांबाबत मोदी सरकारपेक्षा जास्त आग्रही होता. मग आज विरोध का करता आहात? याला आपले अस्तित्व राखण्यासाठी शुद्ध राजकारण का म्हणू नये, असा सवाल प्रसाद यांनी विचारला आहे.