परभणी : महाराष्ट्रात महामारीमुळे अनेक ठिकाणी परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परंतु याकाळात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि विरोधी पक्षातले नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात, तसेच जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्यात व्यग्र असल्यायचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, याचाच एक प्रत्यय म्हणून आज, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी परभणी जिल्ह्याला नवा कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक हे परभणीचे पालकमंत्री आहेत.
‘नवाब मलिक हे राज्य सरकारमधील एक मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे परभणी जिल्हा पालकमंत्री पदासह इतरही अनेक मोठ्या जबाबदार्या आहेत. यामुळे ते परभणी जिल्ह्याला वेळ देण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला पालकमंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी दुसरा सक्षम, पूर्णवेळ देणारा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या, अश्या प्रकारचा आशय असलेले पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.
तसेच, मागील वर्षी आणि यंदाच्या करोना संकटामध्ये एक जबाबदार पालकमंत्री म्हणून, नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही, असा आरोप प्रहारचे शिवलिंग बोधने यांनी केला आहे.
याशिवाय चालू वर्षात ३ महिन्यानंतर त्यांनी पहिला जिल्हा दौरा केला. याशिवाय ते १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे आणि १७ सप्टेंबर या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांव्यतिरिक्त कदाचितच परभणी दौऱ्यावर आले असतील. तसेच त्यांनी जिल्ह्याला दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर कुठलेच काम झालेले दिसत नाही, असाही आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. तसेच या पत्राची एक प्रत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनाही मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.